
Mandavgan Crime: निष्क्रिय श्रीगोंदा पोलीस आणि अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा;दहा दिवस उलटून गेले तरी फरार आरोपी सापडेनात; गंभीर जखमी तरुणांचे नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना
Mandavgan Crime: निष्क्रिय श्रीगोंदा पोलीस आणि अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा;दहा दिवस उलटून गेले तरी फरार आरोपी सापडेनात; गंभीर जखमी तरुणांचे नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना
मांडवगण(श्रीगोंदा): गावातील गावठी दारू, गांजा, हॉटेलमधून होणारी दारु विक्री, वेश्या व्यवसाय यांची खडानखडा माहिती ठेवून दरमहा न चुकता वसुली करणाऱ्या पोलीसांना दहा दिवस उलटून गेले तरी आरोपी सापडत नसल्याने गंभीर जखमी असलेल्या तरुणांचे नातेवाईक व नागरिक संताप व्यक्त करत आहेत. वसुलीच्या कामामुळे आरोपी शोधण्यासाठी पोलिसांना वेळ मिळत नाही का? असा संतप्त सवाल यामुळे उपस्थित होत आहे. गावात वाढत असलेली गुन्हेगारी, राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे आणि पोलीसांची अर्थपूर्ण निष्क्रीयता यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
श्री सिद्धेश्वर महाराज यात्रोत्सवात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांनी एकाच्या डोक्यात फायटरचा घाव घालून गंभीर दुखापत करत बेदम मारहाण केली तर दुसऱ्याला जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकूने भोकसले. पोटात खोलवर चाकू शिरल्याने अत्यवस्थ झालेल्या तरुणावर अहिल्या नगर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सहा आरोपींच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील केवळ दोन आरोपींना अटक करण्यात आली असून इतर आरोपी फरार असल्याने तक्रारदार व जखमींच्या नातेवाईकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. पोलीसांकडून आरोपींना शोधण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात आहे का अशीही शंका उपस्थित होत आहे. अहिल्यानगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने आरोपींना पकडण्याचे निर्देश द्यायला हवेत.
आमदार, खासदार गप्प का?
श्री सिद्धेश्वर महाराज यात्रोत्सवात इतकी मोठी गुन्हेगारी घटना घडलेली असताना आमदार विक्रमसिंह पाचपुते व खासदार निलेश लंके हे गप्प का? मतांची गरज असताना गावातील तरुणांच्या खांद्यावर बसून स्वतः ला मिरवून घेणारे आमदार आणि खासदार जेव्हा तरुणांना आधाराची गरज असते तेव्हा कुठे हरवलेत? गावात शांतता, सामाजिक सलोखा टिकून राहण्यासाठी आमदार, खासदार यांनी ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे.








