
हवेली पोलीस स्टेशनचे अधिकारी बदलले; कारभार सुधारण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा; ‘चांडाळ चौकडी’वर जरब बसविण्याची गरज
हवेली पोलीस स्टेशनचे अधिकारी बदलले; कारभार सुधारण्याची सर्वसामान्यांची अपेक्षा; ‘चांडाळ चौकडी’वर जरब बसविण्याची गरज
पुणे: नुकतेच काही दिवसांपूर्वी हवेली पोलीस स्टेशनच्या मनमानी पद्धतीने कारभार करणाऱ्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्याने वैतागलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला खरा परंतु आता नवीन अधिकाऱ्यांनी ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदाप्रमाने कारभार करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. हवेली पोलीस ठाण्याची डागाळलेली जनमानसातील प्रतिमा सुधारण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘चांडाळ चौकडी’चा बंदोबस्त करणं आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
अगोदरचे पोलीस निरीक्षक अवैध धंदे वाल्यांना ‘भाऊ’ आणि तक्रार घेऊन घेलेल्या सर्वसामान्य नागरिकांना ‘खाऊखाऊ’ करत असल्याने नागरिक हैराण झाले होते. तक्रार अर्ज, तक्रारी दाखल करुन घेतल्या जात नव्हत्या. पोलीस निरीक्षक स्वतःच कटकारस्थान करुन दुसऱ्यांना बदनाम करण्याचा कपटीपणा करत होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा हवेली पोलीस स्टेशन वरचा विश्वास उडाला होता.
आता हवेली पोलीस स्टेशनला नवीन प्रभारी अधिकारी आल्या आहेत. त्यांनी हवेली पोलीस स्टेशन ची ‘काळवंडलेली’ प्रतिमा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे हवेली स्टेशन मधील काही कर्मचारी अवैध धंदेवाल्यांकडून वसुली करण्यासाठी मोकाट फिरत असतात. गुन्हा घडल्यानंतर ‘तोडी’करतात, जमिनीच्या वादात अधिकार नसताना धमकावून शेतकऱ्यांना दमबाजी करतात अशा ‘चांडाळ चौकडी’चा बंदोबस्त करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलीसांविषयी विश्वास निर्माण होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.








