
वाहतूक कोंडीने नागरिक हैराण… प्रशासन दखल घेईना; संतप्त नागरिकांचा आवाज घेऊन रविवारी खडकवासला धरण चौकात महाविकास आघाडीसह स्थानिकांचे आंदोलन
वाहतूक कोंडीने नागरिक हैराण… प्रशासन दखल घेईना; संतप्त नागरिकांचा आवाज घेऊन रविवारी खडकवासला धरण चौकात महाविकास आघाडीसह स्थानिकांचे आंदोलन
(निलेश बोरुडे: संपादक-द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
पुणे:खडकवासला परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीच्या समस्येविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने नागरिकांसह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला
आहे.खडकवासला धरण चौक येथे 9 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4 वाजता हे आंदोलन आयोजित करण्यात आले असून, “खडकवासल्याला वाचवा, नागरिकांचा जीव वाचवा” अशी हाक आयोजकांनी दिली आहे.
खडकवासला परिसरात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी गंभीर होत असून, नागरिक, विद्यार्थी, नोकरदार वर्ग तसेच आपत्कालीन सेवांनाही याचा मोठा फटका बसत आहे. विशेषतः खडकवासला धरण चौक आणि परिसरातील रस्त्यांवर दररोज वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
आंदोलनाच्या माध्यमातून महाविकास आघाडीने प्रशासनासमोर काही प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये खडकवासला येथे पर्यायी रस्ता निर्माण करणे, वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष यंत्रणा उभारणे, सिग्नल व रस्ते सुधारणा करणे, शाळा-महाविद्यालये आणि नागरिकांच्या सोयीसाठी तातडीचे निर्णय घेणे तसेच दीर्घकालीन वाहतूक आराखडा तयार करणे या मागण्यांचा समावेश आहे.
महाविकास आघाडीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, खडकवासला परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. वारंवार पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना होत नसल्याने आता नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.दरम्यान, या आंदोलनाकडे खडकवासला परिसरातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि वाहनचालकांचे लक्ष लागले असून, वाहतूक समस्येवर प्रशासन कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.











