
खानापूर–पाबे रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचे हाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
खानापूर–पाबे रस्त्याची दुरवस्था; नागरिकांचे हाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
पुणे: खानापूर–पाबे मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने वाहनचालक आणि नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. विशेषतः पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाने काही वर्षांपूर्वी या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला होता. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ता अल्पावधीतच उखडला असून त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाली आहे. त्यामुळे खर्च झालेला कोट्यवधी रुपयांचा निधी अक्षरशः खड्ड्यात गेल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
खामगाव येथील रहिवासी प्रकाश लोहकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागावर तसेच लोकप्रतिनिधींवर गंभीर आरोप करताना सांगितले की, “रस्त्याच्या दुरवस्थेमुळे नागरिकांना रोज त्रास सहन करावा लागत आहे. मात्र संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे.”
या मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान होत असून दुचाकीस्वारांना विशेष धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ पाहणी करून रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच निकृष्ट कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात येत आहे.










