![](https://theinvestigationexpress.com/r3e/uploads/2024/02/हवेली-पोलीसांच्या-संवेदना-संपल्या-की-विकल्या-गेल्या-780x470.jpg)
वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकल्याने नागरिक संतप्त; एखाद्याचा जीव गेल्यानंतर पोलीस नियमांची अंमलबजावणी करणार का?
पुणे: किरकटवाडी-नांदोशी रस्त्यावर सकाळी व संध्याकाळी अवजड वाहतूक बंद ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असताना हवेली पोलीस या आदेशाच्या अंमलबजावणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. आज सकाळी डंपरची रांग लागल्याने एक रुग्णवाहिका किरकटवाडी चौकात अडकल्याने नागरिक संतप्त झाले होते.अनेक वेळा पोलीस निरीक्षकांचे लक्ष वेधूनही कार्यवाही होत नसल्याने हवेली पोलीसांच्या संवेदना संपल्यात की विकल्या गेल्यात? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.
किरकटवाडी चौकात व किरकटवाडी फाट्यावर दररोज सकाळी अवजड वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी होत आहे. शालेय विद्यार्थी, नोकरदार, रहिवाशांना याचा त्रास होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सकाळी व संध्याकाळी अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जारी केलेले आहेत. मात्र हवेली पोलीस या आदेशाच्या अंमलबजावणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आज सकाळी एक रुग्णवाहिका या वाहतूक कोंडीत अडकून पडली होती. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यानंतर पोलीस आदेशाची अंमलबजावणी करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
“शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने पहिलं प्राधान्य स्कूल बस आणि रुग्णवाहिका यांना देणे गरजेचे आहे. दोन-दोन तास अगोदर निघूनही मुलं या वाहतूक कोंडीमुळे वेळेत शाळेत पोचतील का याची खात्री नसते. सध्या परीक्षा सुरू असल्याने संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.” विजय हगवणे, नागरिक.
“अवजड वाहतुकीच्या नियमांचे अजिबात पालन होत नाही. पहाटेपासून जड वाहने चालू होतात. या वाहनांचे चालक उद्धटपणे बोलतात. आज तर रुग्णवाहिकेलाही जायला जागा नव्हती.” धनंजय चावट, नागरिक.