![](https://theinvestigationexpress.com/r3e/uploads/2024/02/एनडीए-हद्दीलगतच्या-गावांतील-रहिवाशांना-दिलासा-द्या-780x470.jpg)
MP Supriya Sule:एनडीए हद्दीलगतच्या गावांतील रहिवाशांना दिलासा द्या; खा. सुप्रिया सुळे यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन दिले निवेदन
पुणे: एनडीए हद्दीलगतच्या गावांतील घरांचा पुनर्विकास व नवीन बांधकामांवर संरक्षण विभागाने निर्बंध घातलेले आहेत. पुनर्विकास किंवा नवीन बांधकाम करण्यासाठी संरक्षण विभागाकडून ना हरकत दाखला घ्यावा लागत असून त्यातही दिरंगाई होत असल्याने रहिवाशांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संरक्षण मंत्रालयाने जाचक अटी दूर करुन नागरिकांना दिलासा द्यावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रहिवाशांसह संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्यांना याबाबतच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे.
2017 साली एनडीए परिसरात लष्करी हवाई तळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तेव्हापासून कोंढवे धावडे, शिवणे, कोपरे, उत्तमनगर, कुडजे, किरकटवाडी, खडकवासला व इतर काही गावांतील बांधकामांवर निर्बंध घातलेले आहेत. या गावांमध्ये बांधकाम किंवा दुरुस्तीसाठीही लष्कराकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. 2019 पासून हे ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी नागरिकांनी दिलेले प्रस्तावही एनडीए प्रशासनाने पुढे पाठवले नाहीत.
एनडीए हद्दीपासून 100 मीटर अंतरापर्यंत असलेले काही निर्बंध 10 मीटर अंतरापर्यंतच लागू असतील असा निर्णय घेण्यात आलेला आहे व त्याबाबत सर्वोच्च न्यायालयानेही हे परिपत्रक मान्य केलेले आहे मात्र तरीही एनडीए प्रशासन 100 मीटरच्या अटीवर अडून बसल्याने नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. ज्या नागरिकांनी आपल्या जमिनी एनडीए च्या उभारणीसाठी दिल्या त्यांनाच हा त्रास होत असल्याने त्यांच्या त्यागाचा विचार करुन त्यांना दिलासा द्यावा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच लष्कराच्या हद्दीत असलेल्या अहिरेगाव, मोकरवाडी, सोनारवाडी,वांजळेवाडी व खाडेवाडी या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांचीही दुरवस्था झाली असून या रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध असताना एनडीए प्रशासनाकडून परवानग्या माळण्यात अडचणी येत आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी यात लक्ष घालून नागरिकांना दिलासा मिळेल यासाठी योग्य कार्यवाही करावी अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी सुप्रिया सुळे यांच्यासह त्र्यंबक मोकाशी, विजय गायकवाड, शैलेश चव्हाण, खुशाल करंजावणे आदी उपस्थित होते.