
‘त्या’ रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने दृष्टी गेली; तीन दिवसांत दिसेल म्हटले होते आता हात झटकत आहेत; खानापूर येथील गणेश थोपटे यांसह कुटुंबियांचे रुग्णालयावर गंभीर आरोप
‘त्या’ रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने दृष्टी गेली; तीन दिवसांत दिसेल म्हटले होते आता हात झटकत आहेत; खानापूर येथील गणेश थोपटे यांसह कुटुंबियांचे रुग्णालयावर गंभीर आरोप
पुणे: दोन वर्षांपूर्वी खानापूर मधील थोपटेवाडी येथे राहणाऱ्या व खाजगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गणेश थोपटे यांचा अपघात झाला. त्यावेळी पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली व पायात प्लेट बसविण्यात आली होती. परंतु ती प्लेट चुकीच्या पद्धतीने बसविल्याने काही दिवसांतच पाय सुजला व पायातून पू येऊ लागला. त्यामुळे गुडघ्या खालून पाय कापावा लागल्याने गणेश थोपटे यांना अपंगत्व आल्याचा आरोप गणेश यांच्या पत्नी कल्याणी थोपटे यांनी केला आहे.
घरातील एकमेव कर्ता पुरुष एका पायावर आल्याने अगोदरच कुटुंब चिंतेत होते. गणेश थोपटे हेही काळजी करत बसायचे. अपघातापासून त्यांच्या उजव्या डोळ्याचे दिसणे कमी झाले होते. परंतु अगोदर पाय महत्वाचा असल्याने त्यांनी पाय बरा व्हावा यासाठी प्रयत्न केले. मागील सुमारे दोन महिन्यांपूर्वी थोपटे कुटुंबीय डोळ्यांची तपासणी व उपचार घेण्यासाठी पुन्हा दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात गेले. त्यावेळी वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर डावा डोळा आपण व्यवस्थित करु शकतो असे तेथील डॉ रुपाली नेर्लेकर यांनी गणेश थोपटे व कल्याणी थोपटे यांना सांगितले.
अगोदर इंजेक्शन देण्यात आले, नंतर ऑपरेशन करण्यात आले व त्यानंतर तीनच दिवसांत दिसेल असं सांगण्यात आलं होतं परंतु आता तब्बल एक ते दीड महिना होत आला आहे गणेश थोपटे यांचं पूर्ण दिसणं बंद झालं आहे. अगोदर एका पायावर वॉकर चा आधार घेऊन स्वतः हालचाल करणारे गणेश थोपटे आता पूर्ण परावलंबी झाले आहेत. कल्याणी थोपटे यांनी याबाबत डॉ रुपाली नेर्लेकर यांच्याकडे विचारणा केली असता त्या पेशंट निगेटिव्ह विचार करतोय, पेशंटच्या सेल्स रिस्पॉन्स देत नाहीत अशी उत्तरे देत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. रुग्णालयाच्या हलगर्जीपणाने अगोदर पतीचा पाय गमवला आता दृष्टी गेल्याने कल्याणी थोपटे या संताप व्यक्त करत आहेत. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाने हात न झटकता याबाबत जबाबदारी घेऊन अत्याधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करुन आपल्या पतीच्या किमान एका डोळ्याची दृष्टी पूर्ववत करावी अशी मागणी त्या करत आहेत.