
खामगाव मावळ:ना राष्ट्रीय पेयजल ना जल जीवन; करोडोंच्या पाणी योजना होऊनही पाणी नाही; सिंहगड परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाई
खामगाव मावळ:ना राष्ट्रीय पेयजल ना जल जीवन; करोडोंच्या पाणी योजना होऊनही पाणी नाही; सिंहगड परिसरातील गावांमध्ये पाणी टंचाई
सिंहगड: सिंहगडाच्या पश्चिमेकडील बाजूस असलेल्या खामगाव मावळ या गावात सध्या नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. करोडो रुपये खर्चून अगोदर राबविण्यात आलेली राष्ट्रीय पेयजल योजना व नंतरच्या काळात झालेली जल जीवन मिशन योजना कोणाच्या खिशात गेली? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच लोकप्रतिनिधी केवळ मत मागायला येतात नंतर कोणी लक्ष देत नसल्याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत.
खामगाव मावळ या गावातील आंबरीनाथाचा उत्सव सुरू आहे. गावात नातेवाईक, पाहुणे मंडळी आलेले आहेत मात्र स्थानिक रहिवाशांना उत्सव साजरा करायचे सोडून पाण्यासाठी भटकावे लागत आहे. गावासाठी सुमारे सहा कोटी रुपये खर्चून राष्ट्रीय पेयजल व जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना राबविण्यात आल्या मात्र त्याचा उपयोग नागरिकांना झाला नाही. या योजनांचा निधी संबंधित ठेकेदार, अधिकारी व काही लोकप्रतिनिधींनी मिळून लाटल्याचा गंभीर आरोप नागरिक करत आहेत. तसेच याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
पाणी येत असल्याबाबत खोटे अभिप्राय?
दरम्यान गावात पाणी येत नसताना दुसऱ्या भागातील नागरिकांचे अभिप्राय घेऊन बनवाबनवी करण्यात आली. पाणी मुबलक प्रमाणात येत असल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. संपूर्ण गावासाठी योजना असताना विशिष्ट भागाला फायदा होईल अशा पद्धतीने काम करण्यात आले. परिणामी ज्या उद्देशाने योजना राबविण्यात आली त्याला हरताळ फासल्याचा आरोप नागरिक करत आहेत. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावात येऊन वास्तव पाहून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
“पाणी नसल्याने गावात येऊ वाटत नाही. सणानिमित्त गावात आलोय पण पुरेसं पाणी नाही. शासनाने किमान मुबलक पाणी तरी द्यावे.” लक्ष्मण लोहकरे, नागरिक.
“नळाला येत असलेलं पाणी वाटीने भरायचं आणि लोटीने प्यायचं! अशी परिस्थिती आहे. वर्षानुवर्षे अशीच अवस्था आहे.” रोहिणी लोहकरे, गृहिणी.
“राष्ट्रीय पेयजल आणि जल जीवन मिशन या दोन्ही योजना कुठं आहेत ते शासन-प्रशासनाने येऊन पाहावे. करोडो रुपये निधी खर्च झाला पण त्याचा उपयोग झाला नाही. जुन्या विहिरीतूनच सध्या दिवसाआड थोडा थोडा पाणीपुरवठा सुरू आहे.” सागर भोसले, नागरिक.
“पाण्यासाठी आंदोलन केले, मोर्चा काढला पण शासन दखल घेत नाही. राष्ट्रीय पेयजल योजना व जल जीवन मिशन या दोन्ही योजनांच्या कामाची चौकशी होणे आवश्यक आहे.” प्रशांत भोसले, नागरिक.
“जे पाणी येतंय ते गढूळ येत आहे. लहान मुलं त्यामुळे आजारी पडत आहेत. पंधरा वीस मिनिटात पाणी जातंय. आज गावात यात्रा आहे. घरातील इतर कामे सोडून हे कमी दाबाने येत असलेलं पाणी भरत बसावं लागत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे.” प्रीती लोहकरे, गृहिणी.
“राष्ट्रीय पेयजल योजना व जलजीवन मिशन योजनेच्या कामाबाबत खामगाव मावळच्या नागरिकांच्या तक्रारी आलेल्या आहेत. राष्ट्रीय पेयजल योजनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. जल जीवन मिशन अंतर्गत झालेले काम अद्याप हस्तांतरित करण्यात आलेले नाही. तातडीने अधिकारी पाठवून कामाची पाहणी करून पुढील कार्यवाही केली जाईल.” भूषण जोशी, गटविकास अधिकारी, पंचायत समिती हवेली.