
महिनाभरात आदिवासी कातकरी नागरिकांच्या निवाऱ्याबाबत ठोस उपाययोजना करणार; पुणे जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांची माहिती; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या पाठपुराव्याची दखल
महिनाभरात आदिवासी कातकरी नागरिकांच्या निवाऱ्याबाबत ठोस उपाययोजना करणार; पुणे जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांची माहिती; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या पाठपुराव्याची दखल
पुणे: येत्या महिनाभरात आदिवासी कातकरी नागरिकांना हक्काचा पक्का निवारा मिळावा यासाठी प्रयत्न सुरू असून तशा सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांनी आज द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’शी बोलताना दिली. प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच सर्व आदिवासी कातकरी नागरिकांना हक्काची जागा उपलब्ध करून दिली जाईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबत सातत्याने केलेल्या पाठपुराव्याची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.
खडकवासला, एनडीए गेट, गोऱ्हे बुद्रुक, डोणजे, वरदाडे व परिसरातील आदिवासी कातकरी नागरिकांना हक्काचा निवारा नसून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत ते जीवन जगत असल्याबाबत जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन माहिती देण्यात आली. तसेच यापूर्वीही एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन जिल्हाधिकारी व इतर सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष याकडे वेधून द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने उपाययोजना करण्याची मागणी केली होती.
याबाबत बोलताना जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी म्हणाले की, ” मी याबाबत वैयक्तिक लक्ष घालून तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुढील महिनाभरात या नागरिकांना हक्काची जागा उपलब्ध करून देण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. सर्व बेघर आदिवासी कातकरी नागरिकांना घर मिळेल.”
आधार कार्डची समस्या सुटणार?
सरकारने 18 वर्षांवरील नागरिकांची आधार नोंदणी बंद केलेली असल्याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर येत्या काही दिवसांत तातडीने कॅंप लावून सर्वांचे आधार कार्ड काढून घेतले जातील असे जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांनी सांगितले.
नोडल अधिकारी नेमणार का?
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सातत्याने आदिवासी कातकरी नागरिकांच्या व्यथा मांडून शासकीय पातळीवरून त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी पाठपुरावा केला आहे. परंतु परिपूर्ण काम अद्याप झालेले नाही. अधिकारी केवळ तात्पुरती मलमपट्टी करुन वेळ मारुन नेतात असा अनुभव आहे. त्यामुळे शासकीय पातळीवरून हवेली तालुक्यातील सर्व कातकरी नागरिकांचे वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करुन त्यांची सखोल माहिती गोळा करण्यात यावी व त्यांना आवश्यक कागदपत्रे मिळतात की नाही याची नोंद ठेवण्यासाठी नोडल अधिकारी नेमण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी डॉ जितेंद्र डुडी यांच्याकडे करण्यात आली आहे.